Nashik: ..तर कृषिमंत्र्यांना भिकेचे पैसे देऊ- सदाभाऊ खोत
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कांद्याचे दर कमालीचे कोसळले असताना शेतकर्यांची अवस्था बिकट झाली आहे. कांद्याच्या दराबाबत योग्य धोरण ठरवले नाही, तर राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनाच भीक मागून पैसे देणार असल्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे सांगितले. Nashik
कांदा परिषदेच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेले असताना सदाभाऊ खोत यांनी सोमवारी (दि.6) शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. खोत म्हणाले, शेतकरी हिताच्या निर्णयाला सरकारकडून दिरंगाई केली जात आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे दर दोन ते तीन रुपये किलो असे आहेत. भिकार्यांनादेखील भीक अधिक प्रमाणात दिले जाते. कांद्याच्या दरात सुधारणा आणि इतर शेतकर्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास मंत्रालयावर धडक मोर्चा काढला जाणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले. Nashik
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी शेतकर्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. मोफत वीज तर सोडाच, पण या भारनियमानातून मुक्त करा, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. केवळ वीजपुरवठा सुरळीत नसल्याने यंदाचा रब्बी हंगाम शेतकर्यांच्या हातून गेला आहे. मीटर बंद असतानाही ग्राहकांना वीजबिल आकारले जाते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये किती भ—ष्टाचार बोकाळला आहे, याचा प्रत्यय येतो. त्यामुळेच सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा घणाघात आमदार पडळकर यांनी केला.