नाशिक : युवकाच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या तिघांना पोलिस कोठडी
नाशिक : वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करणार्या युवकाच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने रविवार (दि. 5)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दाखल गुन्ह्यानुसार, भारतनगर येथील शिवाजीवाडी परिसरात शनिवारी (दि. 28) रात्री संशयितांनी सागर प्रकाश रावतर (21) याचा खून केला होता. भारत भोये, गौतम उर्फ उत्तम भोये व गणेश भोये (रा. शिवाजीवाडी झोपडपट्टी) अशी कोठडी सुनावण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.
संशयितांचा शनिवारी (दि.28) रात्री वाद झाला होता. त्यात सागरने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी सागरसह त्याच्या वडिलांना शिवीगाळ केली होती, तर संशयित गणेश भोये याने धारदार शस्त्राने सागरवर वार करून त्याला जिवे मारले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, रविवारी (दि. 29) पोलिसांनी संशयितांना पकडले. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.