

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर निकालाचे गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेटवर विद्यार्थ्याच्या आईचे नाव चुकीचे आले होते. या दोन्ही प्रमाणपत्रांवरील नावाची दुरुस्ती करून देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापकास एक हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. याबाबत चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरवाडे (ता. चाळीसगाव) येथील तक्रारदार यांचा मुलगा कविवर्य श्री ना. धों. महानोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वडगाव (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) येथे सन 2021 मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. या निकालाचे प्रमाणपत्र व बोर्ड सर्टिफिकेटवर विद्यार्थ्याच्या आईचे नाव चुकीचे छापून आले होते. या दोन्ही प्रमाणपत्रांवरील नाव दुरुस्ती करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे मुख्याध्यापक राजेंद्र भास्करराव पाटील, (55, रा. भगवती हौसिंग सोसायटी, चाळीसगाव) यांनी एक हजारांची लाच मागितली होती. त्यानंतर मंगळवारी (दि. 17) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मुख्याध्यापक पाटील यांस त्यांच्या राहते घरी लाच स्वीकारताना अटक केली. ही कारवाई एसीबी पथकाचे उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.