नाशिक : वनसंवर्धन क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची सोय | पुढारी

नाशिक : वनसंवर्धन क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची सोय

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्रात व परिसरात बऱ्याच ठिकाणी वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

नाशिक वनविभाग पूर्व भाग व वनपरिक्षेत्र येवला प्रादेशिक अंतर्गत राजापूर ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये येणाऱ्या राजापूर, ममदापूर, सोमठाण जोश, देवदरी, खरवंडी, रेडाळा, कोळगाव या गावांचा समावेश होतो. या आठ गावांत साडेसात हजार हेक्टर वनक्षेत्र असून, त्यापैकी एकूण साडेपाच हजार हेक्टर वनक्षेत्रात राखीव हा प्रकल्प तयार केलेला आहे. यामध्ये पाच गावांचा वनक्षेत्रांमध्ये समावेश असून, प्रत्येक गावात पशु-पक्ष्यांच्या संरक्षणासाठी सन २०१४ पासून पथके निर्माण करण्यात आली आहेत. वनसंवर्धन क्षेत्रात अधिकारी व कर्मचारी, वनमजूर विशेष लक्ष देत असल्याने व ठिकठिकाणी चौकी उभारण्यात आली असल्याने राखीव क्षेत्रात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. वनसंवर्धन राखीव क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हरीण, काळवीट, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजर, मुंगूस, साळींदर या प्राण्यांबरोबर मोर, गरुड असे विविध जातीचे पक्षी पाहायला मिळतात. मात्र, पारा वाढल्याने उन्हाचा तडाखा वाढत आहे. येवला तालुक्यातील पूर्व भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तरीसुद्धा वनविभागाने टँकरच्या साह्याने वनक्षेत्रात पाणी टाकून तयार केलेल्या कृत्रिम पाणवठ्यामुळे वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. वन संवर्धन क्षेत्रातील एकूण वनक्षेत्रात शेतालगत एकूण वीस कृत्रिम पाणवठे व चार सोलर बोरवेल तयार करण्यात आले आहेत. तसेच छोटे वनतळे बंधारेही तयार केले असल्याने उन्हाळ्यातही पाण्याची सोय उपलब्ध झाल्याने वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळाले आहे. यासाठी मनमाड वनसंरक्षण सुजीत नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहेत्रे, वनपाल मोहन पवार वनरक्षक गोपाळ हरगावकर ममदापूर, गोपाल राठोड वन रक्षक राजापूर व वन विभागाचे अधिकारी व वन मजूर विशेष लक्ष देत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी उन्हातान्हात हरणांची भटकंती सूरू असते.

वन संवर्धन क्षेत्रात पाणी असले तरी राजापूरपासून पश्चिम भागात पन्हाळसाठे व परिसरात खडकाळ भाग असल्याने वन विभागाने येथे कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. तसेच वन विभागाने काही शेतकऱ्यांना सिमेंटच्या कुंड्या दिल्या आहेत. जेणेकरून शेतात त्या कुंड्या पाण्याने भरून ठेवल्याने पशु पक्षी यांना पाणी मिळेल. – अनिल अलगट, सामाजिक कार्यकर्ते राजापूर.

राजापूर ममदापूर वन संवर्धन राखीव क्षेत्रात बरेच विकास कामे झाली असल्याने हरणांच्या पिण्याच्या पाण्याचा व राखीव वन संवर्धन क्षेत्राचा कायापालट होणार असून हरणांसाठी गवती रोपवाटीका यशस्वी करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात हरणांसाठी हिरवा चारा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे वन विभागात प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्यामुळे राजापूर, ममदापूर वन संवर्धन क्षेत्राचा कायापालट होणार आहे. – अक्षय मेहेत्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी येवला.

हेही वाचा : 

Back to top button