नाशिक : दोन वर्षांनंतर गोदावरी ’सुसाट’; लासलगाव रेल्वेस्थानकात जल्लोषात स्वागत
नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील मनमाड, लासलगाव, निफाड व नाशिक येथील चाकरमान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख निर्माण झालेल्या मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर अखेर सोमवारपासून नियमित सुरू झाली आहे.
लासलगाव रेल्वेस्थानकात सकाळी गोदावरी एक्स्प्रेसचे आगमन होताच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांनी सत्कार केला. तसेच रेल्वेचे स्वागत केले. गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गोदावरी एक्स्प्रेस बंद करण्यात आली होती. ती पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. तर गोदावरी तोट्यात चालत असल्याचे कारण देत सुरू करण्याबाबात रेल्वे प्रशासनाकडून नकारघंटा मिळत होती. याबाबत प्रवासी संघटनेने उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल केली आहे. या वादात प्रवाशांसह चाकरमान्यांचे हाल होत असल्याची दखल घेत ना. डॉ. भारती पवार यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर गोदावरी एक्स्प्रेस मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सुरू केल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी पं. स. सदस्य संजय शेवाळे, प्रकाश दायमा, रेल्वे सल्लागार समिती सदस्य राजेंद्र चाफेकर, रेल्वे स्टेशनचे दिव्य पांडे, रेल्वे पोलिस आधिकारी गवई, दत्तुलाल शर्मा, स्मिता कुलकर्णी, रंजना शिंदे, ज्योती शिंदे, शैलजा भावसार, नितीन शर्मा, कैलास केदारे, रूपाली केदारे, बापू लचके यांच्यासह प्रवासी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.