जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना आणि आताच्या काळातील शिवसेना अशी तुलना करून अनेक जण टीका करतात. बाळासाहेबांची शिवसेना कुठे गेली ? असे म्हणणारे लोक पागल आहेत. संघटना मरेल, पक्ष मरेल, पण विचार नाही. बाळासाहेबांचे विचार जोपर्यंत आहेत. तोपर्यंत शिवसेना आहे, असे प्रत्युत्तर पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी विरोधकांना दिले. युवासेनेच्या मेळाव्यात युवा सैनिकांना ते संबोधित करताना बोलत होते.
(Gulabrao Patil ) पाटील म्हणाले की, शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर सुरू आहे. युवकांनी सहभाग घेतल्याशिवाय निवडणूक जिंकणे शक्य नाही. त्यामुळे युवकांनी समाजकारण, राजकारणात सक्रीय होणे आवश्यक आहे. शिवसेना ही एकमेव संघटना आहे, जेथे सत्तेचे विकेंद्रीकरण झाले आहे.
१९९० मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५२ आणि भाजपचे ४२ आमदार निवडून आले आहेत. आता आपल्या झाडावर वाढलेली ही वेल आपल्यालाच पोखरून टाकत आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. शिवसेनेसाठी आता युवकांची गरज आहे. त्यासाठी युवा सैनिकांनी सभासद नोंदणी करुन प्रत्येक गावांमध्ये युवासेनेचा बोर्ड लावावा. प्रत्येक गावांमध्ये युवासैनिक तयार करणे, ही काळाची गरज आहे, असे पाटील म्हणाले.
हेही वाचलंत का ?