जळगाव पुढारी वृत्तसेवा : रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथील एका शेतातून केळीचे घड कापून टाकत चिठ्ठी लिहून धमकावणार्यास पोलिसांनी अटक केली आहे.
रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथील अनिल पाटील यांच्या बागेतील केळीचे ३० घड कापून फेकल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. चिनावल पाठोपाठ कुंभारखेडा येथे हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, याच ठिकाणी केळी खोडांवर शेतकर्यांना धमक्या देणार्या तीन चिठ्ठ्या चिकटवल्या होत्या. यात त्या व्यक्तीने शेतकर्यांनी गावातील लोकांनाच कामाला ठेवावे अन्यथा अशा प्रकारे नुकसान केले जाईल असा इशारा दिला होता.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. या अनुषंगाने पोलिसांनी कुंभारखेडा येथीलच अतुल श्रीराम महाजन (वय ३२) याला अटक केली. चौकशीत त्याने कामावरून कमी केल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे सांगितले. एपीआय देविदास इंगोले यांच्यासह उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड यांचेसह पथकाने ही कारवाई केली.