

मुंबई : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत (फिल्मसिटी) येथे गुरुवारी यवतमाळ येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना संपूर्ण चित्रनगरी फिरण्याची संधी मिळाली. आतापर्यंत दूरदर्शनच्या पडद्यावर ज्या मालिका, चित्रपट पाहिल्या त्याचे चित्रीकरण प्रत्यक्ष पाहताना महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील रसिकाश्रय संस्था ही गेल्या 25 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी ‘जीवाची मुंबई’ हा आगळा वेगळा उपक्रम राबविला जातो. यावर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्याच्या दुर्गम भागातील पतीच्या निधनानंतर शेती आणि घराची जबाबदारी पेलणाऱ्या महिलांना मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीची सफर घडवून आणण्यात आली.
आजवर ज्या मालिका आणि चित्रपट केवळ दूरदर्शनच्या पडद्यावर पाहिले होते, त्याचे प्रत्यक्ष चित्रीकरण कसे चालते, भव्य सेट कसे असतात आणि कलाकार प्रत्यक्षात कसे दिसतात याचा प्रत्यक्ष अनुभव महिलांनी या सहलीच्या माध्यमातून घेतला. गोरेगाव चित्रनगरीत या महिलांचे आगमन झाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह
आणि कुतूहल पाहायला मिळाले. “आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मुंबईला येऊन चित्रनगरी प्रत्यक्ष पाहता येईल,“ अशी भावूक प्रतिक्रिया यावेळी अनेक महिलांनी दिली. चित्रनगरीत दाखल झालेल्या या महिलांच्या संघर्षाला सलाम करत चित्रनगरी प्रशासनाने त्यांना चित्रीकरणाच्या पडद्यामागचे जग जवळून पाहण्यासाठी सहकार्य केले.