

मुंबई : वरळी समुद्रकिनाऱ्यालगतच्या महापालिका शाळेतील इयत्ता सहावी ते दहावीच्या सुमारे 600 विद्यार्थ्यांना हलवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे त्या शाळेतील पालक आक्रमक झाले आहेत.
पालिकेने वरळी समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या महापालिका शाळेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट डिसेंबर महिन्यात केले होते. या ऑडिटच्या अहवालानुसार ही इमारत सी2बी श्रेणीत असून या श्रेणीनुसार संबंधित इमारतीत दुरुस्तीचे काम करून ती इमारत पुन्हा वापरात आणता येऊ शकते. मात्र, पालिकेने या शाळेती इयत्ता सहावी ते दहावीच्या सुमारे 600 विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये हलवण्याबाबतच्या सूचना पालकांना केल्या आहेत.
उन्हाळी सुट्या सुरू होणार असल्याने या डागडुजीचे काम पूर्ण केले, तर पुन्हा जून महिन्यापासून आमची मुले याच इमारतीत शिकू शकतील, अशी भावना काही पालकांनी व्यक्त केली. या इमारतीत असलेल्या अनेक सोयीसुविधा सासमिरा भागातील पालिका शाळेत नसल्याने विद्यार्थ्यांची आणखी गैरसोय होणार असल्याचेही या पालकांचे म्हणणे आहे.
शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतरच हे निर्णय घेतले जातात विद्यार्थी सुरक्षेशी कोणतीही तडजोड आम्ही करणार नाही. या विद्यार्थ्यांना जवळच्याच शाळांमध्ये स्थलांतरित केल्याने त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे सांगत पालिकेच्या शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई महापालिकेच्या शाळा इमारतींना ‘धोकादायक’ घोषित करून विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याच्या निर्णयांची मालिका सुरूच असून, गेल्या तीन वर्षांत सुमारे 3 हजार 500 हून अधिक विद्यार्थ्यांना शाळा बदलावी लागली आहे.
मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आणि उत्तम विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचे सांगत तेथील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याच्या पालिकेच्या मोहिमेला बळ मिळत असून या विरोधात आता प्रखर एकवटण्याची गरज पुढे आली आहे.
आतापर्यंत कोणत्या शाळांतील विद्यार्थ्यांचे झाले स्थलांतर
मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी माहीम येथील ‘न्यू माहीम स्कुल’ या शाळेची इमारत धोकादायक असल्याचे सांगत येथील विद्यार्थ्यांना धारावी तसेच इतरत्र हलवण्यात आले.
या शाळेत सुमारे 1 हजार 500 विद्यार्थी शिकत होते. या सर्वांना इतर शाळांमध्ये हलवल्याने तसेच या शाळा लांब असल्याने पालक तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.
कुलाबा येथील महापालिका शाळेच्या बाबतीतही हाच प्रकार घडला. या शाळेतील 1 हजार 100 विद्यार्थ्यांना पालिकेच्याच आसपासच्या शाळांमध्ये हलवण्यात आले. या शाळेची इमारतही धोकादायक असल्याचे सांगण्यात आले.
घाटकोपर येथील टिळक रोड शाळेच्या बाबतीतही असाच प्रकार घडला. या शाळेची इमारत विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित असल्याचे सांगत पालिकेने येथील सुमारे 400 विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये पाठवले.
पवई येथील पाचपोली भागात असलेल्या दोनपैकी एका शाळेतील विद्यार्थी पालिकेने दुसऱ्या शाळेत वर्ग केले.