

मुंबई : महिला आरक्षण विधेयकासाठी वरळी येथे भाजपाकडून आयोजित करण्यात आलेल्या रॅलीच्या आयोजकाविरुद्ध वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचा या आयोजकावर आरोप आहे. दरम्यान या रॅलीमुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता, याबाबत सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर मुंबई पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जाते.
या रॅलीसाठी वरळी पोलिसांकडून रीतसर परवानगी घेण्यात आली होती. काही अटींवर ही परवानगी पोलिसांकडून देण्यात आली होती.
रॅलीत पंधरा ते वीस हजाराहून महिला आणि पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे तेथील वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या रॅलीबाबत एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारुन आपला संताप व्यक्त केला होता. इतकेच नव्हे तर गिरीश महाजन यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले होते. इथून चालते व्हा, तुमच्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. ही रॅली मोकळ्या मैदानात का आयोजित केली नाही असे अनेक प्रश्न विचारले होते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.