

नेवाळी: नेवाळी नाका परिसरात भाजपा पदाधिकाऱ्यासह त्यांच्या कुटुंबियांवर रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुंडगिरीसमोर प्रशासन हतबल झाले आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या घटनेमुळे स्थानिक पातळीवर संतापाची लाट उसळली असून, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही सुरक्षितता नाही का, अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र पोलिसांनी गुन्हे दाखल करत सहा जणांना अटक केली आहे मात्र गुन्ह्यातील म्होरक्या अद्यापही अटकेपासून वंचित आहे.
भाजपा पदाधिकारी विशाल जुगनू जाधव यांच्या कार्यालयासमोर हातगाडीवर चादर विक्री करणाऱ्या मुन्ना पाल याला आरोपी प्रमोद भोईर याने मारहाण केली होती. हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थिती चिघळली आहे.
त्यानंतर मुन्ना पालसोबत असलेला जखमी भाजपा पदाधिकाऱ्यांचा भाऊ अविनाश हा पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेल्याच्या रागातून आरोपी भावेश भोईर, प्रमोद भोईर, भगवती यादव, ऋषीकेश पवार व त्यांच्या 10 ते 15 साथीदारांनी संगनमताने हल्ला चढविला आहे.
या झालेल्या हाणामारीच्या घटनेची सीसीटीव्ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून पोलिसांसमोर नेवाळीत वाढती गुन्हेगारांची दहशत आवरण्याचा आव्हान उभे ठाकले आहे.या हल्ल्यात विशाल जाधव व त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यात आली आहे.
आरोपी प्रमोद भोईर याने पिस्तूलसदृश हत्याराने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले आहे. तसेच परिसरातील चारचाकी वाहनांच्या काचा व कार्यालयाचे नुकसान करण्यात आले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, गुन्हेगारांचा उघडपणे दहशत माजविण्याचा प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी भावेश भोईर याच्यावर ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल असून, तो परिसरात दहशत निर्माण करत असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे का, असा थेट सवाल उपस्थित होत आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून नेवाळीतील वाढती गुन्हेगारी तातडीने आटोक्यात आणावी, अशी मागणी नागरिक व भाजपा कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे.