

मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपालांच्या नव्या नियुक्त्यांना गुरूवारी मान्यता दिली आणि महाराष्ट्राला जिष्णू देव वर्मा यांच्या रूपाने नवे पूर्णवेळ राज्यपाल मिळाले. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध राज्यांतील राज्यपालांच्या नियुक्त्यांवर गुरूवारी मान्यता दिली आणि महाराष्ट्राला जिष्णू देव वर्मा यांच्या रूपाने नवे राज्यपाल मिळाले. याआधी ते तेलंगणाचे राज्यपाल होते. तत्पूर्वी गुजरातचे राज्यपाल असणारे आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सीपी राधाकृष्णन हे देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवडून गेल्याने इथले राज्यपाल पद रिक्त झाले होते. त्यामुळे 15 सप्टेंबर 2025 रोजी देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा प्रभार सोपविण्यात आला होता.
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णु देव वर्मा यांच्या नावास राष्ट्रपती भवनाकडून मान्यता देण्यात आली. जिष्णु देव वर्मा हे मूळचे त्रिपुरा राज्यातील असून तेथील राजघराण्यातील आहेत. 1990पासून ते भारतीय जनता पक्षासोबत जोडले गेले. त्रिपुराच्या राजकारणात केवळ कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव असणाऱ्या तीन दशकांतही ते भाजपसोबतच राहिले. त्रिपुरात पहिल्यांदाच 2018 मध्ये भाजप सत्तारूढ झाली आणि वर्मा यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद आले.
2024 मध्ये वर्मा यांची तेलंगणा राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. कोलकत्ता विद्यापीठातून इंग्रजी साहित्याची पदवी मिळविलेले वर्मा पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे पूर्णवेळ राज्यपाल म्हणून पदावर विराजमान होतील.
दरम्यान, आचार्य देवव्रत यांची महाराष्ट्रातील कारकीर्द पाच महिन्यांची राहिली. मात्र, या काळात प्राकृतिक शेतीसाठी त्यांनी महाराष्ट्रातही आग्रही भूमिका मांडत प्रयोग केले. त्यांच्या पुढाकाराने सर्व आमदारांची याबाबत कार्यशाळाही झाली.