

मुंबई : श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर व परिसर विकासाचा आराखडा 250 कोटींचा आहे. त्यापैकी 80 कोटींची कामे सुरू आहेत. जोतिबा मंदिर व परिसराच्या सुधारित 170 कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील विधान भवन येथे गुरुवारी (दि. 5) आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जोतिबा मंदिर येथे राज्यातूनच नव्हे, तर देशातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या परिसराचे पर्यावरणीय द़ृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे. या मंदिर परिसराचा विकास हा पर्यावरणीय द़ृष्टिकोनातून करण्यात यावा, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
जोतिबा मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात यावी. घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे करा. अन्न छत्रालय विकसित करा. येथील वस्तीमधील सांडपाणी व्यवस्थापन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यावेळी वन जमिनीचे नियमानुसार हस्तांतरण करून मंदिर परिसराचा विकास व्हावा, यासाठी स्वतंत्र प्राधिकरण बैठकीत सादरीकरण कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार विनय कोरे, आमदार राहुल आवाडे आदी उपस्थित होते.
विकास आराखड्यातून होणारी कामे
* जोतिबा डोंगरावरील जुन्या पायवाटांचे दुरुस्तीसह रुंदीकरण
* विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणार्या वृक्षांचे पुनर्रोपण
* सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, विद्युत नियंत्रण कक्ष
* पोलिस कक्ष, देवस्थान व्यवस्थापन कार्यालय
* यमाईदेवी मंदिर परिसरात भाविकांसाठी सुविधा केंद्र
* मंदिराच्या दक्षिणद्वार प्रवेशमार्गाची दुरुस्ती
* शाहूकालीन हुजूरवाडा इमारत संवर्धन
* कुशिरे ते गायमुख तलाव पार्किंगसह पादचारी मार्गाचा विकास
* पाच मेगावॅट क्षमतेचे वीज उपकेंद्र व सौरऊर्जा प्रकल्प
* भाविकांसाठी निवास व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा कक्ष व अन्नछत्र