

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलच्या लेट मार्कमुळे सध्या प्रवासी त्रस्त आहेत. विशेषत: वसई विरारकरांच्या रोजच्या प्रवासाच्या वेळेत वाढ झाली आहे. रात्री चर्चगेट येथून सुटणाऱ्या एसी लोकल गेल्या काही दिवसापासून तब्बल 20 ते 25 मिनिटे विलंबाने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पश्चिम व मध्य रेल्वेच्या लोकलची रखडपट्टी काही नवीन नाही. अधून मधून याचा त्रास लाखो प्रवाशांना सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट विरार लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
चर्चगेट येथून वेळेत सुटलेल्या लोकल अंधेरी ते बोरिवलीदरम्यान रखडल्या जातात. त्यामुळे चर्चगेट विरार सरासरी 1 तास 25 मिनिटांचा प्रवास 1 तास 45 मिनिट तर काही वेळात दोन तासांपर्यंत जातो.
गेल्या काही दिवसांपासून चर्चगेट येथून रात्री 7.58 वाजता सुटणाऱ्या एसी लोकलचा लेटमार्क आता नित्याचा झाला आहे. ही लोकल विरारला 9.21 ते 9.30 पर्यंत पोहचणे अपेक्षित असते. पण गेल्या काही दिवसांपासून ही लोकल पावणेदहा नंतरच विरारला पोहचत आहे. अनेकदा रात्रीचे दहाही वाजतात.
केवळ हीच एसी लोकल नाहीतर दुपारी व संध्याकाळच्या अनेक लोकल विलंबाने धावतात. त्यामुळे प्रवाशांना 20 ते 25 मिनिट अधिक प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे दाम दुप्पट भाडे देऊन प्रवास करणाऱ्या एसी लोकलच्या हजारो प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
एसी लोकलच्या लेटमार्कबद्दल बोलताना एसीने दररोज प्रवास करणारे रवी शहा, राजू गुरव, अमर संघवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढल्यामुळे एसी लोकलच्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनेकदा चर्चगेट येथून विरारला जाण्यासाठी मुंबई सेंट्रल येथून रिटर्न लोकल पकडावी लागत आहे.
त्यामुळे अगोदरच वेळ वाढलेला असताना, चर्चगेट विरार प्रवासही गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. गर्दीमुळे कधी एकदा प्रवास संपेल असे वाटत असताना एसी लोकलची मोठ्या प्रमाणात रखडपट्टी होत आहे.
महिन्याभरात जेमतेम पाच ते सहा वेळा एसी लोकल वेळेत पोहचतात. इतर वेळी 10 ते 15 मिनिट तर काही वेळा या लोकल 20 ते 25 मिनिटे विलंबाने धावत असतात. त्यामुळे एसीचा प्रवास नकोसा झाला असल्याचे या प्रवाशांनी सांगितले.
एसी लोकलमुळे अन्य लोकलचाही खोळंबा
एसी लोकल रखडत असल्यामुळे अन्य लोकलचाही खोळंबा होत आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांची रखडपट्टी होत आहे. उखाड्यामध्ये वाढ झाल्यामुळे साध्या लोकलमधून प्रवास करताना अक्षरश: प्रवाशांना घामाच्या धारा लागलेले असतात. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना होत आहे.
लोकल रखडण्याची प्रमुख कारणे
गर्दीमुळे लोकलचे दरवाजे बंद न होणे
लोकलच्या स्टेशनवर थांबण्याच्या वेळेत वाढ
सिग्नलवर थांबण्याच्या वेळेत वाढ
वसई नालासोपारा दरम्यान ट्रॅक बदलणे
अंधेरी स्टेशनवर होणारा एसी लोकलचा खोळंबा