

नवी मुंबई :पायधुनी येथे कलिंगड खाऊन चार जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर एपीएमसीच्या फळ बाजारात कलिंगडांची आवकही गडगडली अन् दरही दहा रुपयांनी घसरले आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांनी कलिंगड खरेदीकडे पाठ फिरवल्याने माल पडून राहत असल्याने 20 एप्रिल रोजी 78 गाड्यांची आवक होऊन 6,591 क्विंटल कलिंगड एपीएमसीत विक्रीसाठी बाजारात आले होते. मात्र 29 एप्रिल रोजी ही आवक केवळ 38 गाड्या झाली असून ती 3,325 क्विंटलवर आली आहे.
मुंबईतील या दुर्घटनेनंतर एपीएमसीच्या घाऊक फळ बाजारात कलिंगडांच्या बाजारावर मोठा परिणाम दिसून आला. मुंबईतील ग्राहकांनी कलिंगड खरेदी करणे टाळल्याने किरकोळ व्यापाऱ्यांनी कलिंगड खरेदी करणे कमी केले. त्यामुळे आवक कमी होऊनही मालाला उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोलापूर, अहिल्यानगर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातून कलिंगडांची आवक एपीएमसीत होते. मात्र आता गेल्या तीन दिवसांपासून आवक थंडावली आहे. याचा परिणाम दरावर झाला आहे. घाऊक बाजारात कलिंगड 10 ते 8 रुपये किलोने विकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. 24 एप्रिल आधी हेच दर 18 ते 20 रुपये किलोपर्यंत होते.
पायधुनी दुर्घटनेनंतर कलिंगड विक्री जवळपास ठप्प झाली आहे. 18 ते 20 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या कलिंगडाची 8 ते 10 रुपयांनी विक्री करावी लागत आहे. अचानक भाव घसरल्याने लाखो रुपयांचा फटका बसला आहे. त्या चौघांचा मृत्यू कलिंगड खाल्ल्याने झाल्याचा अजूनही अहवाल आलेला नाही.
तोफीक खान, ठोक विक्रेता, एपीएमसी