

मुंबई: राज्यात मध्यतंरी अवकाळी पाऊस झाल्याने त्याचा फटका विशेषत: फळशेतीला बसला. यामुळे मुंबईतील फळबाजारांत सर्वप्रकारच्या फळांची आवक कमी झाल्याने दरात सरासरी प्रतिकिलो 20 रुपयांची वाढ झाली आहे.
दुसरीकडे, उन्हाचा तडाखा वाढल्याने सिंबा, किरण या प्रकारची कलिंगड व टरबुजाची बाजारात मागणी वाढली आहे. फळांचे दर वाढले असले, तरी ग्राहकांची मागणी कमी झाली नसल्याचे महात्मा फुले मंडईतील (क्रॉफर्ड मार्केट) विक्रेत्यांनी सांगितले.
मुंबईत फळांची मोठी बाजारपेठ महात्मा फुले(क्रॉफर्ड) मार्केट, भायखळा रेल्वे स्थानकाबाहेर, बोरिवली रेल्वेस्थानक परिसर आदी ठिकाणी आहे. याठिकाणी दरवर्षी उन्हाळ्याच्या हंगामात फळ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते.
गेल्या आठवड्यापासून उष्म्याची तीव्रता वाढल्याने हिरवे कलिंगड, टरबुजाला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. त्यातच मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊसामुळे प्रामुख्याने फळशेतीचे नुकसान झाले. कलिंगड, मोसंबी, अननस, नागपूर संत्री या फळांच्या दरामध्ये प्रतिकिलो सरासरी 20 रुपये वाढ झाली आहे.
मोसंबी 60 पासून ते 80 रुपयापर्यंत, डाळिंब 300 रुपये, चिकू 100 रुपये किलो, नागपूर संत्री डझन 180 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यत तर अननस नग 60 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत त्याचे दर गेले आहेत. तसेच हिरवे कलिंगड 40 रुपयांना, तर पांढऱ्या पट्ट्याचे किंवा पांढऱ्या पाठीचे कलिंगड 30 रुपयांना आहे.
मात्र, ग्राहकांकडून पांढऱ्या कलिंगडाला मागणी कमी आहे. ते ज्यूस तयार करण्यासाठी सर्वाधिक वापरले जाते. पॅशन फ्रुटचा किलोचा दर हा 400 रुपयांच्या घरात गेल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
फळांचे दर वाढले असले तरी ग्राहकांची संख्या कमी झालेली नाही. नाशिक व सांगलीतील द्राक्षे, तर कर्नाटकातील सिंबा व किरण या हिरव्या कलिंगडाला ग्राहकांची सर्वाधिक मागणी आहे. याचबरोबर कुंदन व बॉबी याप्रकारचे टरबूज सरासरी 40 रुपयांपासून ते 45 रुपयांपर्यत इतके आहे. आंध्र प्रदेशमधून त्याची आवक होते.
- अशोक पोखरकर, फळ विक्रेते