

मुंबई: ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधातील कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राऊत यांच्या सुनेने पती गितेशसह कुटुंबीयांविरोधात मानसिक छळ आणि कौटुंबिक अत्याचाराचे आरोप केले.
त्यानंतर शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी रविवारी राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र पाठवत या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करण्यची व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नीलम गोऱ्हे यांनी रविवारी राऊत यांच्या सुनेशी फोनवरून चर्चा केली. या लढ्यात तुम्ही एकट्या नाही. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे गोऱ्हे यांनी सांगितले.
राऊतांच्या सुनेच्या वकिलांशीही दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या प्रकरणाच्या कायदेशीर बाजूची माहिती घेतली. या प्रकरणाची कोणताही राजकीय दबाव न येता सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली.
पारदर्शक चौकशी करा : दमानिया
एका माजी खासदारावर आणि त्यांच्या कुटुंबावर, कौटुंबिक छळाचे कलम ८५ आणि नरबळी व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्याची कलम ३ (२) व ३ (३) कलमे लागणे धक्कादायक आहे. सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबावर असे आरोप झाल्यास याची चौकशी पारदर्शकपणे व्हावी, अशी अपेक्षा आहे.
याप्रकरणी विनायक राऊत यांनी काही प्रश्नाची उत्तरे द्यायला हवीत. एफआयआर मध्ये नमूद आहे की, राऊत यांच्या सांगण्यावरून कुटुंबीयांनी तक्रारदाराला वेगवेगळ्या ‘बाबां’कडे नेले. या दाव्यावर त्यांची प्रतिक्रिया काय? एवढी गंभीर कलमे लागलेली असताना, तुम्ही चौकशीला सहकार्य करणार का आणि याबाबत तुमची भूमिका काय असेल, असे प्रश्न अंजली दमानिया यांनी केले आहेत.