

Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut:
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविरोधात सून गिरीजा राऊत यांनी गुन्हा दाखल केला आहे. गेली सात वर्षे शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा, तसेच जादूटोणा आणि अघोरी प्रकार केल्याचा आरोप गिरीजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे.
गिरीजा राऊत यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत राऊत कुटुंबावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. "सासरच्यांकडून माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. आपल्याला बळजबरीने गोमूत्र पिण्यास भाग पाडले, तसेच डोक्यावरील केस उपटून अघोरी कृत्य केले," असा दावा त्यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना गिरिजा राऊत म्हणाल्या, "एक नियोजन करून आमचा घात करण्यात आला. गेली सात वर्षे माझा आर्थिक, मानसिक आणि भावनिक छळ सुरू होता. सासरचे कुटुंब राजकीय क्षेत्रातील असल्यामुळे आणि मला संसार वाचवायचा असल्याने मी आजवर तक्रार केली नव्हती. पुढे सर्व काही नीट होईल असे मला वाटले, पण तसे घडले नाही. सप्टेंबर २०१८ पर्यंत आमच्यात शारीरिक संबंध आले नव्हते. यावर चर्चा करण्यासाठी आम्ही एक बैठक घेतली होती. त्यावेळी 'गणपतीनंतर यावर बोलू' असे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात अघोरी कृत्ये करण्यात आली. काही वैद्यकीय चाचण्याही केल्या गेल्या. मला वेगवेगळ्या बाबांकडे नेले जायचे. जिवंत कोंबड्या अंगावरून उतरवणे, अंगारे लावणे, गोमूत्र प्यायला देणे असे प्रकार घडले. पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्यामुळे माझा छळ केला जात होता. आमच्या प्रतिष्ठेला धक्का बसला तर बघून घेऊ, अशी धमकी देत मला सतत मारहाण केली जात होती."
"विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत राहतात. ते नवरात्रीला घट बसतात तेव्हा आणि घट उठतो तेव्हाच घरी यायचे. फक्त फोनवरूनच सूचना द्यायचे. माझ्या सासऱ्यांनी कुटुंबप्रमुख म्हणून कधीही सासू आणि पतीला नीट वागण्याचे समजावले नाही," असा गंभीर आरोपही गिरिजा राऊत यांनी केला.
गिरीजा राऊत यांचे वकील सागर कदम हे देखील पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, "फिर्यादी गिरिजा राऊत यांच्यासाठी माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलाचे स्थळ आले होते. बोलणी होऊन हे 'अरेंज मॅरेज' झाले. मुलाच्या समस्येची कल्पना असूनही त्यांनी जाणीवपूर्वक एका सामान्य कुटुंबातील मुलीशी लग्न लावून दिले. मुलगा अक्षम असल्यामुळे त्यांनी अघोरी कृत्यांचा आधार घेतला आणि मुलीमध्येच काहीतरी कमी आहे, असा मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही याप्रकरणी फसवणुकीचाही गुन्हा दाखल केला आहे."
माजी खासदार विनायक राऊत यांनी मात्र हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. "माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. ती (गिरीजा) गेल्या तीन वर्षांपासून गितेशसोबत राहत नाही. तिचे आई-वडील स्वतः बाबा-बुवांकडे जात होते, मग तेव्हा त्यांनी तक्रार का केली नाही? २०२२ मधील घटनेची २०२६ मध्ये तक्रार केली जात आहे, यावरूनच यात काहीतरी काळंबेर असल्याचे स्पष्ट होते," असे राऊत म्हणाले.
विनायक राऊत पुढे म्हणाले, "घटस्फोटाचा खटला दाखल केला आहे. पहिल्या बैठकीत त्यांनी ५ कोटी रुपये, ३-बीएचके फ्लॅट, दरमहा २ लाख रुपये आणि गाडीची मागणी केली होती. दुसऱ्या बैठकीत ही मागणी वाढवून १० कोटी रुपये आणि दरमहा ५ लाख रुपये करण्यात आली. मानसिक त्रासापोटी २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई, अशी एकूण १२ कोटी रुपयांची मागणी करत घर आणि गाडीवरही त्यांनी हक्क सांगितला. ही अवाजवी मागणी आम्ही मान्य केली नाही, म्हणूनच हे सगळे खोटे आरोप करण्यात आले आहेत."