

मुंबई: विधान परिषदेच्या रिक्त नऊ जागांपैकी महाविकास आघाडीचे संख्याबळ बघता केवळ जागा त्यांच्या वाट्याला 1 जागा येत असल्याने उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. मात्र आघाडीत सर्वाधिक 20 आमदार उद्धव ठाकरे गटाचे असल्याने त्यांनी या जागेवर दावा केला आहे.
राज्यसभेची एक जागा शरद पवार यांच्यासाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने माघार घेतली होती. त्यामुळे विधान परिषदेच्या जागेसाठी दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ही जागा महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गट लढवेल, असे समजते.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही जागा लढवावी, असा ठाकरे गटातील नेत्यांचा आग्रह आहे. पण तब्येतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे यांनी ही जागा लढवली नाही तर ठाकरे गटाकडून दुसरा उमेदवार दिला जाईल. पण हा उमेदवार कोण असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. काँग्रेसकडून या जागेसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक नेते इच्छुक आहेत. तसेच ठाकरे गटाकडून या जागेसाठी अनेक नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे समजते.