

मुंबई: ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना वारंवार फोन करून काँग्रेसने उमेदवार देऊ नये, यासाठी मनधरणी केली. त्यानंतर काँग्रेसने विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अंबादास दानवे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेची उमेदवारी काँग्रेसला देण्यात येईल, या अटीवर ठाकरे गटाला पाठिंबा दिला असल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली तर काँग्रेस पाठिंबा देईल, असे काँग्रेसकडून आधीच स्पष्ट केले होते. पण उद्धव यांनी स्वतः उभे न राहता अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसने उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला होता. उमेदवार निवडीबाबत काँग्रेसच्या नेत्यांची बैठक गुरुवारी गांधी भवन येथे सुरू होती.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांची बैठक सुरू असताना ठाकरे गटाचे शिष्टमंडळ काँग्रेस नेत्यांच्या भेटीला आले.
खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार मिलिंद नार्वेकर आणि अंबादास दानवे यांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली. आघाडीत प्रत्येक वेळी काँग्रेसला डावलले जाते. आम्ही आघाडीसाठी त्याग करतो. पण यावेळी या उमेदवारीवर काँग्रेसचा दावा असल्याचे सपकाळ यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना सांगितले. मात्र हा पाठिंबा देताना आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेची उमेदवारी काँग्रेसला दिली जाईल, अशी अट काँग्रेसने घातली आहे.
फोनाफोनीनंतर काँग्रेसचा अंबादास दानवेंना पाठिंबा
ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू असतानाच दरम्यानच्या अडीच तासात उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस नेत्यांना फोनवर फोन येत होते. उद्धव ठाकरे - हर्षवर्धन सपकाळ यांच्यात चार वेळा फोनवरून बोलणे झाले. चेन्नीथला आणि उद्धव ठाकरे यांच्यात तीन वेळा फोनवरुन बोलणे झाले. के सी वेणुगोपाल आणि ठाकरे यांच्यात दोनवेळा बोलणे झाले. शेवटी काँग्रेसने अंबादास दानवे यांना पाठिंबा दिला.