

मुंबई: उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र विमानप्रवासावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात टोलेबाजी रंगली आहे.
विमान प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हतबल दिसत होते. फडणवीसांना कळतंय की, त्यांचे पंख छाटले जात आहेत, असा दावा ठाकरेंनी केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मला पंखच नाहीत, मग छाटणार तरी कोण? असा प्रतिसवाल उद्धव ठाकरेंना केला.
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, एवढा हतबल मुख्यमंत्री मी त्यादिवशी पाहिला, त्यांना कळत होतं की पंख आपलेच बॉस कापत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे काय झाले तेसुद्धा भाजप अध्यक्ष होते? पण नंतर काय इथेनॉल पाणी टाकले आणि त्यांचे पंख छाटले. आता नितीन गडकरी कुठेय?
फडणवीस म्हणाले, ते एका कोपऱ्यात बसले होते. तर मी दुसऱ्या कोपऱ्यात बसलो होतो. मी विमानात बसल्यानंतर सवयीनुसार डाऊनलोड केलेला विमान उतरेपर्यंत पाहात होतो. त्यामुळे माझी हतबलता कुठे दिसली माहीत नाही? मी मनुष्य असल्याने मला पंखच नाहीत, मग माझे पंख कोण छाटणार आहेत, असा प्रतिहल्ला देवेंद्र फडणवीस यांनी केला.
माझ्यासोबत १४ कोटी लोकांचे आशीर्वाद आहेत. माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे यांच्या सदिच्छा मी स्वीकारतो. त्या २०१९ साली असत्या तर चित्र वेगळं राहिले असते. त्यावेळी देऊ शकले नाहीत. त्यांच्या सदिच्छा आज स्वीकारतो, असे फडणवीस म्हणाले. ठाकरे आणि मी बाजूला बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या. विमानप्रवासात योगायोगाने एकत्र आलो, असेही ते म्हणाले.