मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत असताना आज (दि.31) दुपारी राज्याच्या कारभार चालवणाऱ्या मंत्र्यांच्या बंगल्यातील वीज पुरवठा खंडीत झाला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे एकही मंत्री बंगल्यात मुक्कामाला नाहीत. पण याचा फटका बंगल्यातील कर्मचाऱ्यांना बसला. चोवीस तास गारेगार वातावरणात वावरणारे हे कर्मचारी घामाघूम झाले होते. राज्याच्या कारभार पाहणाऱ्या मंत्र्यांची मलबार हील, वाळकेश्वर आणि मंत्रालयासमोर शासकीय निवासस्थाने आहेत. त्यापैकी मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानांसमोरील डीपीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे या भागातील विज पुरवठा खंडीत झाला.
या डीपीतून अतुल सावे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, डॉ. तानाजी सावंत, अदिती तटकरे, दादा भुसे, रविंद्र चव्हाण, शंभूराज देसाई, बाळासाहेब भवन, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवर यांच्या निवासस्थानांना विजपुरवठा होतो. आज दुपारी दोनच्या सुमारास या मंत्र्यांच्या बंगल्यांचा वीज पुरवठा खंडीत झाला. तांत्रिक अडचणीमुळे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडीत होता.