![कार्यकर्त्याने पाय धुतल्याच्या घटनेवर नाना पटोलेंच स्पष्टीकरण](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2FUntitled-design-1-215.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने हाताने धुतल्याचा प्रकार समोर आल्यानंतर याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गजानन महाराजांच्या पालखी दर्शनासाठी गेल्यानंतर तेथील मैदानात चिखल असल्याने पाय खराब झाले होते. कार्यकर्त्याने पाणी आणले तो पाणी टाकत होता आणि मी माझ्या हाताने पाय धुतले, असे त्यांनी म्हटले आहे. ईडीमध्ये ज्यांचे पाय माखले आहेत ते अंधारात पाय धुतात, असा पलटवारही पटोले यांनी केला आहे.
सोमवारी अकोला जिल्ह्यातील वाडेगावमध्ये कार्यक्रमाला होतो. तिथे गजानन महाराजांची पालखी मुक्कामी होती. मी वारकरी प्रथेतील माणूस आहे. त्या ठिकाणी गजानन महाराजांची पालखी आल्याने दर्शन घ्याव वाटलं. दर्शनासाठी गेलेल्या मैदानात चिखल असल्याने पाय खराब झाले. कार्यकर्त्यांनी पाणी आणले, तो पाणी टाकत होता आणि मी माझ्या हाताने पाय धुवत होतो. वारकऱ्यांना बदनाम करण्याचं काम फडणवीस सरकारमध्ये झालं होतं. भाजपने 'हर घर जल' नारा दिला होता, पण जलच नाही त्यामुळे वरतूनच पाणी टाकावं लागलं, असा टोला त्यांनी लगावला.
राज्यात बोगस बियानांचा सुळसुळाट सुरू आहे. खत आणि बियाणे कंपन्यांशी सरकारचा थेट संबंध आहे, असे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते. बोगस खते मिळू नयेत यासाठी सरकारने वचक ठेवला पाहिजे. शेतकरी कर्जात असताना मदत होत नाही. शेती हंगाम कसा करायचा हा प्रश्न आहे. अचारसंहितेचं कारण देत बँकांनी कर्जपुरवठा केला नाही. शेतकरी कर्जाच्या चिखलात माखला आहे, त्याला बाहेर काढा. सरकारने शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून द्यावा, अशी काँग्रेसच्या वतीने मागणी करत असल्याचे पटोले म्हणाले.
हेही वाचा :