

मुंबई : दाटीवाटीने वसलेल्या वस्तीमध्ये आग अथवा इमारत पडण्याची दुर्घटना घडल्यास तेथे तातडीने अग्निशमन दलाला पोहोचता यावे, यासाठी चाळकऱ्यांना गल्लीमध्ये वाहने उभी करण्यास बंदी घालण्याचा विचार मुंबई महापालिका करत आहे. परंतु वाहनांच्या पार्किंगसाठी मुंबई महापालिकेकडे कोणतीच पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे चाळकऱ्यांना सशुल्क पार्किंगचा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यामुळे हजारो वाहन चालकांना फुकटचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
अरुंद गल्लीमध्ये आग अथवा इमारत पडण्याची दुर्घटना घडल्यास तेथे तातडीने अग्निशमन दलाला मदत देता येत नाही. त्यामुळे वित्त आणि जीवितहानी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अरुंद गल्लीत सम आणि विषम याप्रमाणे पार्किंग धोरण राबवण्यासह काही भागांमध्ये पूर्णपणे पार्किंग बंद करण्याचा विचार पालिकेचा आहे. पण हा विचार करण्यापूर्वी महापालिकेने येथील चाळकऱ्यांच्या पार्किंगला पर्याय सुचवणे अपेक्षित होते. परंतु गाड्या उभ्या करण्यासाठी महापालिकेकडे कोणताही पर्याय नाही. तशी कबुली पालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दक्षिण मुंबईतील चिरा बाजार, काळबादेवी, झव्हेरी बाजार आदी गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात होलसेल व्यापारी असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. त्यात रस्त्याच्याकडेला गाड्याही उभ्या असतात. त्यामुळे येथील बहुतांश गल्लीमध्ये वाहतूक कोंडी दिसून येते.
अडथळ्यांमुळे निर्णय
होलसेल मार्केट असल्यामुळे येथे कमी जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होते. पण आपत्कालीन परिस्थितीमध्ये गल्लीमध्ये गाड्या उभ्या असल्यामुळे अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांना घटनास्थळी वेळेत पोहचता येत नाही. यामुळे काही गल्ल्यांमध्ये सम व विषम पार्किंग व काही गल्ल्यांमध्ये नो पार्किंग करणे आवश्यक असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पालिकेने हाती घेतलेल्या या कारवाईमुळे मुंबईतील नागरिकांकडूनही अनधिकृत पार्किंगबाबत मुंबई अग्निशमन दलाकडे तक्रार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनधिकृत पार्किंगबाबत जर नागरिकांनी तक्रार केली, तर संभाव्य तक्रार संबंधित पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस विभाग व संबंधित विभाग कार्यालयाकडे वर्ग केला जाईल, असे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी सांगितले.
काळबादेवीमध्ये सम विषम पार्किंगचा प्रयोग
काळबादेवीमध्ये काही गल्ल्यांमध्ये सम विषम तारखेला पार्किंग करण्याचा प्रयोग सुरू आहे. यात कोलबाट लेनसह वेलकर स्ट्रीट, झुवेरी बाजार गल्ली, दवा बाजार गल्ली, मुंबादेवी व अन्य गाळ्यांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांना आपली वाहने रस्त्याच्या कडेला सम विषम तारखेला उभी करता येतात.
दक्षिण मुंबईतील चंदनवाडी, गिरगाव, काळबादेवी, गावदेवी, ताडदेव, मुंबई सेंट्रल, नागपाडा, आग्रीपाडा, भायखळा आदी भागांत 240 पेक्षा जास्त अरुंद गल्ल्या असून या गल्ल्यांच्या लगत दोन्ही बाजूंना चाळी वसल्या आहेत. यातील 35 ते 40 गल्ल्या अशा आहेत की, त्या गल्ल्यांमधून जेमतेम एक गाडी जाऊ शकते, एवढीच जागा आहे.
दक्षिण मुंबईतील पार्किंगचा दर अव्वाच्या सव्वा असून एका गाडीसाठी मासिक सुमारे दीड ते दोन हजार तर काही ठिकाणी तीन ते साडेतीन हजार रुपये शुल्क आकारण्यात येते. त्यामुळे या पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करायच्या झाल्या तर रहिवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.