

मंत्र्यांचे मूल्यांकन आणि भाकरी फिरणार
नवीन चेहऱ्यांना संधी
कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ
BMC Election Shiv Sena Eknath Shinde: राज्यात लवकरच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये मोठे संघटनात्मक आणि मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटातील मंत्र्यांच्या कामाची 'लिटमस टेस्ट' या निवडणुकीच्या निकालांवर अवलंबून असेल.
महापालिका निवडणुकीनंतर प्रत्येक संबंधित मंत्र्याच्या कामगिरीचे मूल्यांकन (Performance Appraisal) केले जाणार आहे. नगराध्यक्ष आणि नगरपरिषद निवडणुकीत यश-अपयशाचे निकष देखील लावले जातील. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत संबंधित मंत्र्यांना किती यश मिळवता आले, यावरून त्यांचे राजकीय वजन ठरवले जाईल.
सरकार स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षांनी मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देऊ, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच केले होते. आता त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यास किंवा संघटनात्मक पातळीवर अधिक भर देण्यासाठी, काही विद्यमान मंत्र्यांकडे पक्षाच्या महत्त्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे निवडणुकीतील कामगिरीच्या आधारावर काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते.
मंत्र्यांनी निवडणुकीत पक्षाला जिंकून आणण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यांचे नेतृत्व आणि निवडणुकीचे अंतिम निकाल या सर्व गोष्टींचे सखोल मूल्यांकन केल्यानंतरच हे महत्त्वपूर्ण फेरबदल केले जातील.
या फेरबदलांमध्ये कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते आणि कोणाला पक्ष संघटनेची जबाबदारी दिली जाते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.