

मुंबई : आयआयटी- मुंबईच्या संशोधनातून उभी राहिलेली ‘सेडेमॅक’ ही ऑटो-इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपनी आता शेअर बाजारात दाखल होत असून, शैक्षणिक संस्थांमधून उभ्या राहणाऱ्या संशोधनाधारित नवउद्योगांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आयआयटीच्या नवउद्योग प्रोत्साहन परिसंस्थेतून सार्वजनिक होणारी ही दुसरी कंपनी ठरणार आहे. यापूर्वी 2023 मध्ये आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी या ड्रोन तंत्रज्ञान कंपनीने समभाग विक्रीद्वारे शेअर बाजारात प्रवेश केला होता.
सेडेमॅक ही कंपनी आयआयटी सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप या नवउद्योग संवर्धन केंद्रातून विकसित झाली आहे. या केंद्राकडे सध्या कंपनीचे सुमारे 4.08 लाख समभाग असून, सार्वजनिक समभाग विक्रीसाठी निश्चित केलेल्या कमाल किंमतपट्टीनुसार (प्रति समभाग 1,352 रुपये) या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे 55 कोटी रुपये इतके असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सेडेमॅकची सुरुवात आयआयटी-मुंबईच्या प्रयोगशाळेत झालेल्या संशोधनातून झाली. मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील प्रा. शशिकांत सूर्यनारायणन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला वाहनांसाठी प्रगत नियंत्रण प्रणाली विकसित करण्याचे संशोधन सुरू केले. त्या संशोधनातून पुढे व्यावसायिक तंत्रज्ञान विकसित करण्याची कल्पना पुढे आली आणि 2008 मध्ये सेडेमॅकची स्थापना झाली.
आज ही कंपनी वाहन उद्योगाशी संबंधित सहाय्यक घटकांच्या क्षेत्रात कार्यरत असून, वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणाली विकसित करण्याचे काम करते. भारतातील तसेच परदेशातील अनेक वाहन उत्पादक कंपन्यांकडून या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
आयआयटी-बॉम्बेच्या या नवउद्योग संवर्धन केंद्रातून उभ्या राहिलेल्या कंपन्यांचे एकत्रित मूल्यांकन सध्या सुमारे 3.9 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.
आयआयटीचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी सांगितले की, संस्थेतील संशोधनातून उभी राहिलेली कंपनी सार्वजनिक होणे ही आयआयटी मुंबईसाठी अभिमानाची बाब आहे. वैज्ञानिक संशोधन आणि उद्योजकतेची सांगड घातल्यास जागतिक स्तरावर स्पर्धा करणारे उद्योग उभे राहू शकतात.
आयआयटीचे उपसंचालक प्रा. मिलिंद अत्रे यांनीही संस्थेच्या संशोधन व नवोपक्रम परिसंस्थेचे हे यश असल्याचे नमूद केले. तर या नवउद्योग संवर्धन केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाजी वर्गीज यांच्या मते, सेडेमॅकचा समभाग विक्रीद्वारे बाजारात प्रवेश हा भारतातील शैक्षणिक नवउद्योग संवर्धन क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. या केंद्राचे प्राध्यापक प्रभारी निशांत शर्मा यांनी सांगितले की, मजबूत संशोधन आणि योग्य मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास त्यातून मोठे उद्योग निर्माण होऊ शकतात.