

मुंबई : जुहू चौपाटी कचराभूमी बनली असून समुद्राला भरती आल्यानंतर दररोज ३५० मेट्रिक टन कचरा चौपाटीवर फेकला जात आहे. गेल्या दहा दिवसात १ हजार ८०० मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला आहे. त्यामुळे समुद्रात जाणारा कचरा रोखण्यात महापालिका फेल ठरली आहे.
मुंबईतील लाखो मेट्रिक टन कचरा समुद्रात जात असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. सुमारे ७ किलोमीटर पसरलेल्या जुहू बीचवर सध्या दररोज जवळपास ३५० मेट्रिक टन कचरा जमा होत आहे. गेल्या आठवड्यात शहरात मुसळधार पाऊस पडत होता. तेव्हा हा कचरा नाल्यांमधून समुद्रात गेला. समुद्र आपल्या पोटात कचरा ठेवत नसल्यामुळे भरतीच्या वेळी हा कचरा किनाऱ्यावर फेकला जात आहे. त्यामुळे जुहू चौपाटीची कचराभूमी बनली आहे. पर्यटकांसह मुंबईकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ उपसण्यात येत असला तरी नाल्यातील पाण्यात तरंगणारा कचरा तसाच पडून असतो. हा कचरा मुसळधार पावसाच्यावेळी समुद्रात जातो. तरंगणाऱ्या कचऱ्याकडे अनेकदा लोकप्रतिनिधींचे नागरिकांनी लक्ष वेधले होते. मात्र महापालिकेने फारसे गांभीर्याने घेतले नाही. तरंगणाऱ्या कचऱ्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. पण हा कचरा रोखण्यात पालिकेला अपयश आले आहे.
ट्रॅशबूमही कुचकामी
मुंबई उपनगरातील नाल्याच्या ठिकाणी ट्रॅशबूम लावण्यात आले आहेत. त्यामुळे नाल्यांमधून वाहत जाणारा कचरा ट्रॅशबूममध्ये अडकून पडतो. परंतु ट्रॅशबूमही कुचकामी ठरले असून तरंगणारा कचरा मोठ्या प्रमाणात समुद्र फेकला जात आहे. दरम्यान ट्रॅशबूममध्ये अडकलेला कचरा काढण्यासाठी खास तराफे बनवण्यात आले होते. पण ही उपाययोजनाही फेल ठरली आहे.
दररोज ६० मेट्रिक टनकचरा उचलला जातोय
समुद्रकिनारा स्वच्छतेची मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी पालिकेने मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात केली आहे. सध्या २ बीच क्लीनिंग मशीन, २ बॉबकॅट, १० डम्पर, १ जेसीबी दोन शिफ्टमध्ये काम करणारे १५० सफाई कामगार कार्यरत आहेत. सध्या जुहू चौपाटीवर साधारणपणे दररोज ६० मेट्रिक टन कचरा जमा होत आहे. दर आठ तासांनी येणाऱ्या भरतीमुळे स्वच्छतेमध्ये सतत आव्हानांचा सामना करावा लागत आहे. वारंवार येणाऱ्या भरतीमुळे समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा ताजा कचरा येतो. त्यामुळे चौपाटीवर कचरा दिसून येत असल्याचे घनकचरा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
श्वेतपत्रिका काढण्याची विरोधकांची मागणी
नाल्यांतील कचरा वेळेत उपसला जात नसल्याने तो थेट समुद्रात वाहून जात आहे. त्यामुळे निळाशार समुद्र अक्षरशः काळवंडून गेला आहे. समुद्रकिनाऱ्यावर ठिकठिकाणी तब्बल तीन-तीन फूट उंचीपर्यंत कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. स्वच्छतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांचे विदारक आणि लज्जास्पद चित्र पाहायला मिळत आहे. प्रदूषित समुद्रकिनारे हे पालिका प्रशासनाच्या निष्क्रिय, ढिसाळ आणि बेफिकीर कारभाराचे जिवंत पुरावे आहेत.
मुंबईकरांच्या आरोग्याशी आणि शहराच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेशी संबंधित या गंभीर प्रकरणाची सर्वंकष चौकशी करून महापालिकेने तातडीने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.