

Satej Patil On Unemployment: काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात राज्यातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून सरकारला चांगलेच धारेवर धरलं. मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमवर आज (दि. २४ जून) सतेज पाटील यांनी राज्यात वाढत चाललेली बेरोजगारी आणि सरकारी नोकर भरती जाहिरातीत होणारा गोंधळ त्यामुळं लांबणारी भरती प्रक्रिया यावरून सरकारवर टीका केली.
सतेज पाटील म्हणाले, 'राज्यभर बेरोजगारी वाढली असून महाराष्ट्र हे उद्योगशील राज्य आहे. सरकारी नोकर भर्तीची एखादी जाहिरात निघाली की लाखो लोक तिथं अर्ज करतात. कारण राज्यात जे मोठमोठे प्रोजेक्ट सुरू आहेत ते पैसे खाण्यासाठीच सुरू झाले आहेत. तिथून उद्योग वाढत नाही म्हणून रोजगार वाढत नाही. हे फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स म्हणावं लागेल.
सतेज पाटील पुढे म्हणाले, 'जाहिरातीमध्ये चुका होतात त्यामुळं भरती लांबते. जाहिरातीत मुद्दाम चुका केल्या जातात का? सरकार बेरोजगारीच्या प्रश्नावर संवेदनशील नाही. हे एक षडयंत्र असून सरकारला भरती करायची नाहीये का असा सवाल देखील पाटील यांनी विचारला.
नीट परीक्षेबाबत देखील सतेज पाटील यांनी सरकारला घेतलं. ते म्हणाले, '२३ लाख मुलं नीट परीक्षा देतात. साधी नीट परीक्षा तुम्ही घेऊ शकत नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आम्ही आधापासूनच करत आहोत. नीट बाबत विद्यार्थ्यांमध्ये विश्वासार्हताच राहिलेली नाही.
सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आज सायंकाळी सात वाजता महाविकास आघाडीची बैठक आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित या बैठकीला हजर राहणार आहेत. अधिवेशन काळात अशी बैठक होत असते. जे सहा खासदार ठाकरेंची शिवसेना सोडून गेले त्यांना काँग्रेसची देखील मते मिळाली होती. दरम्यान, या बैठकीत सगळ्या विषयांवर चर्चा होईल. विधिमंडळात महाविकास आघाडी म्हणून कोणते मुद्दे मांडायचे यावर देखील चर्चा होईल.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी स्वर्गिय आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना मराठी भाषेची जी खांडोळी केली त्यावरून सतेज पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांवर खोचक टीका केली. ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी मराठी भाषेला श्रद्धांजली वाहिली. गटनेत्यांच्या बैठकीत शोक प्रस्तावावर बोलायचं नाही फक्त अध्यक्षांनी भाषण करायचे हे आधीच ठरले होते. पण विधानसभा अध्यक्ष जर प्रस्ताव मांडत असेल आणि अशा प्रकारे चूक होत असेल तर हे दुर्दैव आहे.