![क्रांती रेडकर](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F10%2Fk-5.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मागील काही दिवसांपासून मुंबई ड्रग्ज प्रकरणी मंत्री नवाब मलिक हे 'एनसीबी'चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मलिक यांनी वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचे काही फोटोही ट्विट केले आहेत. या प्रकरणी अआता समीर वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात म्हटलं आहे की, आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे सहन झालं नसतं. आज बाळासाहेबांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. मी लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झाली आहे. मी एक मराठी मुलगी असल्याचेहीक्रांती रेडकर ने म्हटलं आहे.
" मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत मी लहानाची मोठी झाली आहे. मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले आहे. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे दोघांनी शिकविलं. तोच धडा गिरवत आज मी एकटी माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे. लढते आहे. सोशल मीडिया आणि त्यावरच लोक फक्त मजा बघतात. मी एक कलाकार आहे. राजकारण मला कळत नाही आणि मला त्यात पडायचं देखील नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लत्करं चार-चौघांत उधळली जातात.
"आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खासगी हल्ले हे राजकारणाचे नीच स्वरुप आहे. हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आज ते नाही पण, तुम्ही आहात. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही माझ्यावर व माझ्या कुटुंबीयांवर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळे एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्या न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय. तुम्ही योग्य ते न्याय करा ही विनंतीही या पत्रात केली आहे.