

मुंबई : महाराष्ट्रातील सहा खासदार उद्धव ठाकरे यांना 'जय महाराष्ट्र' करीत एकनाथ शिंदे यांचेकडे गेले तेव्हाच कामगार नेते आणि विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. शिवाय स्वतःही शिंदेंकडे जाणे निश्चित केले, अशी माहिती आता समोर आली आहे.
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे सचिन अहिर यांचे अत्यंत जिगरी दोस्त आहेत. दोघांचीही मैत्री जगजाहीर आहे. संजय दिना पाटील हे सचिन अहिर यांच्या संपर्कामुळे अंतिमतः शिंदेकडे येण्यास तयार झाले, असेही बोलले जाते. सचिन अहिर हे गेल्या काही वर्षांपासून आदित्य ठाकरे यांच्याबरोबर सावलीसारखे वावरत असले तरी ते मनाने शिवसेनेत फारसे आनंदी नव्हते, असे म्हणतात.
मनपा निवडणुकीपासून सुरुवात मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये गेल्या वेळी जेव्हा केवळ दोन नगरसेवकांचाच फरक होता तेव्हा सचिन अहिर यांनी काही नगरसेवक भाजपमध्ये येण्यास तयार असल्याचा निरोप दिला होता, अशीही माहिती आता चर्चेत आली आहे. मात्र त्यावेळी सरकार वाचवणे आवश्यक असल्याने भाजपने उद्धव ठाकरे यांना दुखावले नाही. मात्र सचिन अहिर यांचा वेगळा प्रवास तेव्हापासूनच मनाने सुरू झाला होता. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले, असे मानले जाते.
काही कामगार संघटनांवर पकड
सचिन अहिर मुंबईतल्या कामगार विश्वात तसेच झोपडपट्टी भागात ताकद असलेले नेते मानले जातात. काही कामगार संघटनांवरील त्यांची पकड आणि त्यांना मानणारा कामगारांचा वर्ग लक्षात घेता मुंबईत पाय राहून उभे राहण्यासाठी एक नवा महत्त्वाचा नेता शिंदे यांना मिळाला आहे. वरळी भागातून ते विधानसभेवर सलग तीनदा निवडून गेले होते. आदित्य ठाकरे यांनी तेथून लढण्याचा निर्णय २०१९ साली घेतला तेव्हा सचिन अहिर यांनी त्यांच्या समवेत असावे असे थेट मातोश्रीतर्फे त्यांना कळवले गेले होते. त्यांनी ते मानले.
पक्ष आकसत चालल्याने भूमिका बदलली
सुनील शिंदे हे वरळीचे आमदार होते. मात्र आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे नाराज झाले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना सचिन अहिर यांनी मदत करावी, असे धोरण अमलात आणले गेले. गेल्या काही वर्षात ठाकरे शिवसेनेची वाढ न होता हा पक्ष आक्रसत चालला असल्याचे सचिन अहिर यांच्या लक्षात आले. त्यांनी भूमिका बदलली. त्यांच्या मध्यस्थीमुळे काही खासदार पक्ष बदल करणार याची कुणकुण आम्हाला आधीपासून होती, असे आता शिवसेनेचे नेते खासगीत नमूद करत आहेत.
राजकीय अस्तित्व कायम राखणार अंबादास दानवेंना निरोप
उद्धव ठाकरे यांनी सचिन अहिर यांच्यावर कायम विश्वास टाकला होता. पण ते विश्वासाला पात्र होते का, असाही प्रश्न आज केला जात आहे. मंगळवारी सकाळी अर्ज भरण्यासाठी येतो असे उत्तर सचिन अहिर यांनी ठाकरे शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते अंबादास दानवे यांना फोनवर सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात मी माझे राजकीय अस्तित्व कायम राखण्यासाठी वेगळा निर्णय घेतो आहे. मला स्वतःच्या जोरावर राजकारण करायचे आहे. मला कोणत्याही घराण्याचा वारसा नाही, असे त्यांनी या निरोपात नमूद केले होते.
सचिन अहिर अपात्र होणार नाहीत : अॅड. असीम सरोदे
शिवसेना उबाठातून परिषदेतील केवळ एका सदस्याने सचिन अहिर यांनी पक्ष बदलला असला तरी पक्षांतरबंदी कायदा त्यांना लागू होणार नाही. पक्षांतर बंदी कायद्यातील दहाव्या अनुसूचीतील परिच्छेद ५ नुसार लोकसभेचेनअध्यक्ष आणि उपाध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती, राज्याच्या विधान परिषदेच्या सभापती-उपसभापती आणि विधान सभेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष या पदांवर नियुक्त झालेल्या व्यक्तींना या नियमातून सवलत देण्यात आली आहे. पक्षांतरबंदी कायद्याच्या परिच्छेत ५ नुसार अहिर यांना अपात्रतेपासून संरक्षण आहे, असे अॅड. असीम सरोदे यांनी फेसबुकवर लिहिले आहे.
आदित्य ठाकरे यांना धक्का
वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य यावेळी अल्प मताधिक्याने जिंकले. आता तेथून तीनवेळा निवडून आलेले अहिर समवेत नसल्याने त्यांची जागा धोक्यात येऊ शकते, असे चित्र आहे.
विधान परिषदेत ठाकरे यांचे केवळ पाच आमदार
शिवसेना उद्धव ठाकरे गटाची विधान परिषदेतील संख्या या बदलामुळे आता केवळ पाच आमदार अशी झाली आहे. शिवसेना उबाठाची संख्या काँग्रेसपेक्षाही जास्त होती. आता सारेच संदर्भ बदलले.