

मुंबई: ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी आणखी एक संधी देण्यात आली असून प्रवेशाची मुदत २४ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिली आहे. राज्यभरात अद्यापही ८ हजार जागा रिक्त असल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत २ लाख ८९ हजार २८६ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज नोंदवले. त्यापैकी १ लाख ५ हजार ८१ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली. नियमित निवड फेरीत ७९ हजार ७७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.
रिक्त जागांसाठी तीन प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामध्ये पहिल्या प्रतीक्षा यादीतून १२ हजार ९५०, दुसऱ्या प्रतीक्षा यादीतून ३ हजार २८७, तिसऱ्या प्रतीक्षा यादीतून १,०३३ आणि चौथ्या फेरीत ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तरीही राज्यभरात ८,००३ जागा रिक्त राहिल्या आहेत.
या रिक्त जागांवर अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रवेशाची अंतिम मुदत २४ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित पालकांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.