

मुंबई: संतपरंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८.५५ कोटी, अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळासाठी २५ कोटी आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरसाठी ४१.७५ कोटी या तीन तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांना एकूण ११५ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
आराखड्यातील सर्व कामे उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेऊन दर्जेदार पद्धतीने व टप्प्याटप्प्याने निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथी गृह येथे विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समिती बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार चरण सिंग ठाकूर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.
संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८.५५ कोटी रुपये
परभणी येथील संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८.५५ कोटी रुपये विकास आराखड्यामध्ये संत जनाबाई जन्मस्थळ परिसरात सांस्कृतिक सभागृह, गोदावरी घाट विकास, दर्शन मंडप, उद्यान व सुशोभीकरण, पाथवे, मंदिर ते घाट सिमेंट काँक्रीट रस्ता, गोरक्षण इमारत, संरक्षक भिंती, जलनिस्सारण व्यवस्था, विद्युत सुविधा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, सौरऊर्जा, सीसीटीव्ही, पिण्याचे पाणी, लँडस्केपिंग आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे.
संत गाडगेबाबा समाधिस्थळ विकासासाठी २५ कोटी
अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधिस्थळ विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या कामांमध्ये श्री संत गाडगे महाराज स्मृती केंद्र कल्चरल व्हॅल्यू एज्युकेशन सेंटरचे उर्वरित बांधकाम, श्री संत गाडगे महाराज स्मृति भवन परिसरामध्ये शेतकरी ग्राम सफाई मिशन सेंटर तळमजल्याचे बांधकाम करणे, यात्री निवासाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे बांधकाम, कीर्तनासाठी सभागृह, समाधीचा जीर्णोद्धार व सौंदर्यीकरण, ध्यान केंद्रासाठी इमारत, कुंताबाई समाधीचे सौंदर्यीकरण, अंतर्गत रस्ते, पार्किंग, बगीचे, फर्निचर व इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे.