

मुंबई: राज्यातील बळीराजाला कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनें’तर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून २२ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्याचे स्वतः सूतोवाच केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि त्यांच्या विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्याचा सरकारचा पूर्ण प्रयत्न राहील.
कर्जमाफीच्या प्रक्रियेतील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून आयकर डेटासंदर्भातील माहितीही प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि अजित पवार यांची जयंती, असे औचित्य साधून प्राथमिक यादी प्रसिद्ध केली जाईल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ
महायुती सरकारने यापूर्वीच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करून ३६ लाख अतिरिक्त शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या योजनेंतर्गत एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.
सन २०१९ च्या कर्जमाफीतील लाभार्थ्यांसाठी असलेली ५० हजारांची मर्यादा रद्द करून ती २ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या २३ लाख शेतकऱ्यांना लाभ नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सुमारे २३ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी नवीन कर्जाची उचल करण्याची अटही रद्द करण्यात आली आहे.