Railway Track Accident: रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू ‘अनुचित घटना’ नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई : रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून झालेला मृत्यू हा रेल्वे कायद्यांतर्गत अनुचित घटना मानली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आणि रेल्वे दावा न्यायाधिकरणाचा नुकसानभरपाई नाकारण्याचा निर्णय कायम ठेवला. प्रवाशाने रेल्वे रूळ ओलांडण्याची चूक केलेली असते. अशा स्थितीत प्रवासी भरपाईचा दावा करू शकत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले
5 ऑगस्ट 2006 रोजी एका रेल्वे प्रवाशाचा नालासोपारा आणि भाईंदरदरम्यान रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. त्या मृत प्रवाशाची पत्नी सिंधू देवानंद शिवदास यांनी रेल्वेकडे नुकसानभरपाईसाठी दावा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, पती चालत्या गाडीतून पडल्यामुळे हा अपघात झाला होता. त्यांच्या या दाव्यावर रेल्वे प्रशासनाने आक्षेप घेतला होता. त्याच आधारे रेल्वे दावा न्यायाधिकरणाने मृत व्यक्तीच्या पत्नीला नुकसानभरपाई नाकारली होती.
न्यायाधीकरणाच्या निर्णयाला आव्हान देत मृत प्रवाशाच्या पत्नीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तिच्या याचिकेवर न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने सुनावणी घेतली आणि निर्णय दिला. अपघातानंतर प्रवाशाला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सोबत असलेल्या मित्राने मृत प्रवाशाला रेल्वे रूळ ओलांडताना मागून येणाऱ्या गाडीने धडक दिल्याने दुखापत झाल्याचे सांगितले. न्यायालयाने त्याचा जबाब ग्राह्य धरला आणि रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू होणे ही अनुचित घटना नसल्याचे निरीक्षण नोंदवत नुकसानभरपाई देण्यास नकार दिला.

