

मुंबई : मुंबईपुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या ’इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस)’ मुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले आहेत. गेल्या दीड वर्षांत या प्रणालीच्या मदतीने 36 लाख वाहनचालकांवर
ई-चलानद्वारे कारवाई करत तब्बल 599 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र, जानेवारी 2026 पर्यंत जवळपास 85 टक्के वाहनचालकांनी ई-चलानची रक्कम भरलेली नाही, त्यामुळे कोट्यवधी रुपयांची दंडाची रक्कम अद्याप थकीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लेखी उत्तरात दिली आहे.
मुुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहन चालकांकडून ई-चलानाच्या कोट्यवधी रूपयांच्या थकित रकमेची वसूली करण्यासंदर्भात ठाकरे सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.
थकबाकीच्या वसुलीसाठी शासनाने काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. केंद्र शासनाच्या 20 जानेवारी 2026 च्या अधिसूचनेनुसार चलान वसुलीसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून वाहनधारकांना दंड भरण्याची आठवण करून देण्यासाठी बल्क एसएमएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे वाहनधारकांना त्यांच्या मोबाईलवर ई-नोटीस पाठवली जात असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले आहे.