

Prasad Lad Post: मराठा आरक्षणाबाबत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी ३० मे पासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेतील अडचणी आणि तृटी दूर करण्याबाबत मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच अंमलबजवणी नीट होत नसल्याचा देखील आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
भर ऊन्हात आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने जरांगे पाटील यांचे हे आदोलन राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. म्हणूनच आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना एक भावनिक पोस्ट लिहून मी आम्ही येतोय असं म्हणत भावनिक साद घातली आहे.
दादा मी येतोय ...शब्द पाळायला येतोय
सोबत उपसमिती अध्यक्षाला घेऊन येतोय….
पण एक भाऊ म्हणून मला शब्द हवा आहे
या तापलेल्या उन्हात स्वतःला त्रास करून घेऊ नये..
स्वतःचे पाय आणि अंग पोळवून घेऊ नये..
मुळात उपोषणच आता प्रकृतीला झेपणार नाही.
आपल्या अपेक्षा पूर्तीसाठी आम्ही येत आहोत.
मी आणि विखे पाटील साहेब सोबत येत आहोत.
आपल्या मराठा समाजासाठी येतोय…
आपल्या मराठा समाजाला तुझी गरज आहे…
एवढच तुझ्या भावाच सांगणं आहे.
तू उन्हात स्वतःला त्रास करून घेऊ नकोस!
तुझा मराठा बंधू
प्रसाद लाड
दरम्यान, आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही. मी भर ऊन्हात हे उपोषण सुरू करत आहे. उष्माघाताने माझा मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल असा इशारा देखील त्यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी भाजपवर विशेष निशाणा साधत अजित पवार गाटाचे मंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री आमची कामे करतात. मात्र भाजपकडून असं काही होताना दिसत नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली होती.