

Manoj Jarange Patil
जालना: मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत ३० मे पासून आमरण उपोषणाला सुरूवात करणार आहेत. या आंदोलनाला ३ कोटींपेक्षा जास्त मराठा बांधव सहभागी होणार आहेत. जरांगे पाटील यांनी आज (दि.१६) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा-कुणबी प्रमाणपत्रे देणे बंद केले आहे. आंदोलन सुरू करण्याच्या आधी सर्वांना प्रमाणपत्रे देऊन पडताळणी करावी, तुमचं शहाणपण मराठ्यांच्या समोर नको, अन्यथा आंदोलन एवढ तीव्र करू की मुख्यमंत्री फडणवीस यांना चारही दिशांना मराठेच दिसतील, असा इशारा देत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.
अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्हणाले की, "मराठा-कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. अधिकारी हैद्राबाद गँझेटनुसार प्रमाणपत्र देत नाहीत. सरकारने देऊ नये म्हणून सांगितलं आहे, असे सांगतात, याला जबाबदार फडणवीस आहेत. कारण मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतो, असे फडणवीस यांनीच एका भाषणात सांगितलं होतं. त्यामुळे प्रमाणपत्रे त्यांनीच रोखली, असा आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.
"आंदोलनाची तारीख जाहीर करण्याआधी मराठा-कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत. महाराष्ट्रात मराठ्यांच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या ग्रामपंचायतींमध्ये लावाव्यात. तसेच १९९४ ला ओबीसी आरक्षण देण्यासाठी जसा जीआर काढला तसा सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे संस्थानच्या गॅझेटियरचा जीआर काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू," असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.
"मराठा आरक्षणाचा मुद्दा आजीबात सोडायचा नाही. न्याय मिळेपर्यंत मागे हटायचं नाही. असा आक्रमक पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे. आता आंदोलन एवढ तीव्र करायच की मुख्यमंत्री फडणवीस यांना चारही दिशांना मराठेच दिसले पाहिजेत," असेही ते म्हणाले. एका मंत्र्यांनी माझ्या विरोधात बोलण्यासाठी एका संघटनेला २ कोटी असे १६ संघटनांना पैसे दिले, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. मात्र, त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही.