

नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने मोठ्या गाजावाजात नवी मुंबईतील पारसिक हिलवर वृक्षारोपण करण्यात आले. फोटोसेशन झाले, बातम्या झळकल्या, ‘माझी वसुंधरा’ अभियानासाठी गुण मिळाले. मात्र पावसाळा संपताच या झाडांकडे प्रशासनाने पूर्णतः पाठ फिरवली. आज प्रत्यक्ष पाहणीमध्ये या प्रकल्पातील बहुतांश झाडे पाण्याअभावी होरपळलेली असून उर्वरित झाडे अक्षरशः अखेरच्या घटका मोजत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका व आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पारसिक हिलवर अभियांत्रिकीदृष्ट्या नियोजनबद्ध असा त्रिस्तरीय वृक्षारोपण प्रकल्प राबवण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत करंज, जांभूळ, चिंच, शिसम, मलबेरी, शेवगा, मोहगनी, आवळा, बांबू यांसारख्या भारतीय प्रजातींची झाडे, तसेच लॅन्टाना, कणेर, बोगनवेल, खस (व्हेटीवर) गवताची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. सुमारे 7,500 झाडे, 5,000 झुडपे आणि 16,000 खस गवत अशी एकूण जवळपास 15,000 रोपांची लागवड करण्यात आली होती. सीएसआर निधीतून ठिंबक सिंचन व्यवस्था, पाण्याच्या टाक्या, तसेच भूस्खलन प्रतिबंधासाठी आवश्यक भौगोलिक नियोजनही करण्यात आले होते.
पारसिक हिलवरील संपूर्ण वृक्षारोपण प्रकल्पाची तातडीने संयुक्त व पारदर्शक पाहणी करावी. वाळलेल्या व वाळत असलेल्या झाडांसाठी त्वरित पाणीपुरवठा व शास्त्रीय देखभाल सुरू करावी. वृक्षारोपणानंतर किमान 3 वर्षांची देखभाल सक्तीची करून त्याची स्पष्ट जबाबदारी निश्चित करावी. केवळ लागवडीच्या आकड्यांऐवजी ‘जिवंत वृक्षांचे सर्व्हायव्हल ऑडिट’ सार्वजनिक करावे, अशा मागण्या सजग नागरिक मंचाने नवी मुंबई महापालिकडे केल्या आहेत.