

कुर्ला : देवनार पशुवधगृहात बकरी ईदनिमित्त 80 हजारांपेक्षा अधिक बकऱ्यांची आवक झाली असून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि रायगड परिसरातून मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात याठिकाणी बकरे खरेदीसाठी येत आहेत.
देशातील सर्वात मोठे पशुवधगृह अशी या देवनार पशुवधगृहाची ओळख आहे. त्यामुळे दरवर्षी बकरी ईदच्या काही दिवस अगोदर राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, जम्मू, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून व्यापारी आपले बकरे घेऊन याठिकाणी येत असतात.
17 मे पासून याठिकाणी बकरे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार बुधवारी दुपारी बारापर्यंत याठिकाणी 82 हजार 395 इतके बकरे दाखल झाले आहेत. तर केवळ 6 हजार 722 बकऱ्यांची विक्री झाली आहे. येणाऱ्या तीन ते चार दिवसात याठिकाणी 1 लाखापेक्षा अधिक बकरे दाखल होण्याचा अंदाज व्यपाऱ्यांनी वर्तवला आहे.
व्यापारी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी यावर्षी पालिकेकडून काही हेल्पलाईन सुविधा देखील सुरू केली असल्याची माहिती यावेळी देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलिमपाशा पठाण यांनी दिली आहे.
महापालिकेकडून चोख व्यवस्था
महापालिकेने ग्राहक आणि व्यापाऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली आहे. तसेच बकऱ्यांना पाण्याची सोय केली असून शेड उभारण्यात आले आहेत. संपूर्ण पशुवधगृहात लाईट, शौचालय, निवारा आणि डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांचाही चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. जागोजागी आधुनिक सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.