

नवी मुंबई : नगरविकास विभागाने नामंजुरीची मोहोर उमटवल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सेवानिवत्तीचे वय 58 वरून 60 करण्याचा ठराव गुरुवारी महासभेत मंजूर केला. कितीही विरोध झाला तरी हा प्रस्तावाला मंजुरी घेऊ. वेळ पडल्यास न्यायालयातही दाद मागू, अशी भूमिका यावेळी सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडली.
गुरुवारी झालेल्या महासभेत हा प्रस्ताव पुन्हा मांडण्यात आल्यानंतर विरोधकांनी विरोध केला, तर महापालिका आयुक्तांनी हरकत घेतली. त्यानंतरही बहुमताच्या जारोवर हा ठराव मंजूर करण्यात आला. यावर सभागृह नेते सागर नाईक यांनी भूमिका मांडली. त्यांनी थेट महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला.
आयुक्तांनी राज्य सरकारला महासभेचा प्रस्ताव पाठवणे गरजेचे होते. मात्र तसे न करता स्वत:चे पत्र पाठवले आणि त्यामुळे वयोमर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाने खंडित केला, असा आरोप केला.
यावर आयुक्तांनी, आम्ही ठरावाच्या विरोधात नाही. अंमलबजावणी करण्याचा अधिकार सचिवाचा असतो, तर महापालिकेचे आयुक्त आणि त्यांच्या हाताखाली हे सर्व कर्मचारी कशासाठी तयार केले असते? असे स्पष्ट केले.
सागर नाईक यांनी निवृत्त अधिकारी पुढील दोन वर्षे पालिकेत राहिले तर त्याचा फायदा महापालिकेला होणार असल्याने हा ठराव केला आहे. मला खात्री आहे, नगरविकास विभाग व राज्य शासन या निर्णयावर सकारात्मक भूमिका घेईल. जर हा ठराव पुन्हा विखंडित झाला तर आम्ही न्यायालयात जाणार असल्याचही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.