

सांगली : तपास करत असताना साक्षीदाराचा जबाब घेण्यास विलंब लागला, तपासकामात काही तांत्रिक त्रुटी राहिल्या, याचा फायदा आरोपींना देऊ नये. त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अनिकेत कोथळे खून-खटल्याच्या सुनावणीप्रसंगी शनिवारी केला.
जिल्हा सत्रन्यायाधीश एस. आर. पडवळ यांच्या न्यायालयामध्ये अनिकेत कोथळे खून-खटल्याची सुनावणी सुरू आहे. न्यायालयासमोर अंतिम युक्तिवादास सुरुवात झाली आहे. शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. बचाव पक्षातर्फे उलटतपासामध्ये अनेक त्रुटी व उणिवा न्यायालयासमोर आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे. ॲड. निकम यांनी ते मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले, आरोपींना तपासातील तांत्रिक गोष्टींचा फायदा देता कामा नये. यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायनिवाडे त्यांनी न्यायालयासमोर आणले. ॲड. निकम म्हणाले, दि. 6 नोव्हेंबर 2017 रोजी रात्री 8 ते 9 यादरम्यान अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला या पोलिसांनी अमानुष मारहाण केली होती. त्यातच अनिकेतचा मृत्यू झाला. अनिकेतच्या खुनास सर्व संशयित जबाबदार आहेत. आंबोली येथे मिळालेल्या मृतदेहाचे अवशेष अनिकेत कोथळेचेच आहेत हे न्यायवैद्यक तज्ज्ञाकडून शाबित झाले आहे. दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी 13 मार्च 2026रोजी होणार आहे.