

Narhari Zirwal
मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील विभागाचा कारकून राजेंद्र ढेरंगे यांना लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहात अटक केली. झिरवाळ यांचे खासगी सचिव (पीएस) रामदास गाडे यांच्याच सांगण्यावरून पैसे मागितले असा जवाब ढेरंगे याने दिल्याचे समजते. यावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नरहरी झिरवाळ यांनी आज (दि. १३) दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला. लाचप्रकरणाशी माझा संबंध सिद्ध झाल्यासा राजीनामा देईन, असे झिरवळ यांनी म्हटलं आहे. "काल झालेला प्रकार चुकीचा आहे, अस व्हायला नको. काल ज्यांना पकडलं ते क्लार्क म्हणून काम करतात. ते मुळचे अन्न व पाणी पुरवठा विभागाचे आहेत. त्यांना उसणवारीवर घेतलं होतं. कालच्या प्रकाराला पाठिशी घालणार नाही. शासकीय किंवा कायदेशीर बाब असेल त्याला त्याचा जाब द्यावा लागेल," असे झिरवळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, 'लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ज्यांना पकडले आहे ते किरकोळ लोक आहेत. एसीबीने मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे,' अशी मागणी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाचे मंत्री आहेत. यापूर्वी ते विधानसभेचे उपाध्यक्ष होते. विद्यमान सरकार मध्ये त्यांना अन्न व औषध प्रशासन ची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून केमिस्ट परवाने प्रकरणात लाच घेतली जात असल्याचे सांगितलें जात होते. ती तक्रार अखेर खरी ठरली. मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कारकून राजेंद्र ढेरंगे लाच घेऊन कामे करतो, अशी मुळ तक्रार होती. हात ओले केल्याशिवाय त्याच्याकडे काम होत नाही असे तक्रारदाराचे म्हणणे होते.
वैद्यकीय परवाना देण्यासाठी राजेंद्र ढेरंगे याने ५० हजार रुपयांची मागणी केली आणि ३५ हजार रुपयांवर मांडवली झाली, या पक्षकाराच्या तक्रारीनुसार मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याच कार्यालयात राजेंद्र ढेरंगे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचला. मंत्री झिरवाळ यांचा पीएस रामदास गाडे याच्या सांगण्यानुसारच आपण लाच घेत होतो असे राजेंद्र ढेरंगे याने कबूल केले, असे सूत्रांचे म्हणणे आहे.