

मुंबई : मुंबईसह राज्यातील घुसखोर बांगलादेशीयांचा प्रश्न जिल्हा नियोजन बैठकीत उपस्थित करीत मुंबईसह राज्यातील घुसखोरांना हाकला, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. बांगलादेशीयांच्या कागदपत्रांची तपासणी करीत संशयित कागदपत्रे आढळल्यास ती रद्द करावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
स्थानिक आमदार अमीन पटेल यांनी यावर आक्षेप घेतला. घुसखोरांना हाकलण्याबाबत आमची काही हारकत नाही. मात्र त्यांच्या नावाखाली फेरीवाल्यांना छळू नका अशी भूमिका त्यांनी मांडली. मुंबई हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे शहर असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होणारी कामे अत्यंत दर्जेदार असावीत. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या विकासकामांचा अभिमान वाटावा, अशा पद्धतीने टीमवर्कने कामे करा असेही आवाहन त्यांनी प्रशासनाला केले. ज्या यंत्रणा त्यांचा मंजूर निधी व कामे विहित कालावधीत पूर्ण करणार नाहीत अशा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल,
असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला. बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार सर्वश्री सचिन अहिर, सुनील शिंदे, प्रसाद लाड, मनिषा कायंदे, चित्रा वाघ, अजय चौधरी, अमीन पटेल, महेश सावंत, मनोज जामसुतकर, शिवाजीराव गर्जे, जगन्नाथ अभ्यंकर, ज्योती गायकवाड, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी संदीप बकरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.