

मुंबई : महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी कचरा संकलन करणाऱ्या कॉम्पॅक्टर वाहनाचा आकस्मिक मागोवा घेत त्याच्या संपूर्ण मार्गाची आणि प्रत्यक्ष कचरा संकलन प्रक्रियेची पाहणी केली. कचरा साचण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतूक सुरू होण्यापूर्वीच प्राधान्याने झाडलोट (रस्ता सफाई) करावी. मुख्य रस्ते आणि हमरस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. तसेच, पदपथ नागरिकांना चालण्यायोग्य आणि अतिक्रमणमुक्त ठेवावेत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी सकाळी ७.०० वाजता पूर्व उपनगरातील मानखुर्द, गोवंडी तसेच शहर विभागातील परळ परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्वच्छता चौक्या, परिरक्षण चौक्या आणि रस्ते दुरुस्ती चौक्यांना भेटी देत तेथील दैनंदिन कामकाजाची पाहणी केली.
यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती, हजेरी नोंद, स्वच्छतेसाठी उपलब्ध यंत्रसामुग्री आणि इतर आवश्यक सुविधांची माहिती घेतली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत दैनंदिन कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाट प्रक्रियेचा आढावा घेतला. तसेच, स्वच्छता व्यवस्थेची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि वेळेचे काटेकोर नियोजन सुनिश्चित करण्यासाठी अधिक परिणामकारक पद्धतीने कामकाज करण्याचे निर्देश दिले.
कचरा साचण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करून तेथील स्वच्छता कायम राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे. कचरा संकलनाचे काम दररोज दोन सत्रांत राबवावे.
कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या आणि फेऱ्या वाढवाव्यात. झोपडपट्टी व तत्सम भागातील कचरा संकलन व्यवस्था अधिक सक्षम व नियमित करून कोणत्याही ठिकाणी कचरा साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत समन्वय वाढवून त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा. संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करावी.
प्रत्येक परिसराची भौगोलिक रचना, लोकसंख्या, कचरा निर्मितीचे प्रमाण आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन परिसरनिहाय स्वच्छता धोरण तयार करावे, असे स्पष्ट आदेश भिडे यांनी दिले.