

Mumbai to Vijaydurg ferry service
मुंबई: कोकणचा लाडका सण असलेल्या शिमगोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी शिमग्याला कोकणी माणसाला थेट समुद्रातून बोटीने गावी जाता येणार आहे. १ मार्चपासून मुंबई (भाऊचा धक्का) ते विजयदुर्ग अशी 'एम टू एम' फेरी सेवा सुरू होत असून, याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि रेल्वेच्या गर्दीतून सुटका करण्यासाठी सरकारने हा जलद मार्ग उपलब्ध करून दिला आहे. मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर या फेरीमुळे अवघ्या सात तासांत पार करता येईल. या उपक्रमाची घोषणा करताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, १ मार्च रोजी होणाऱ्या पहिल्या प्रवासात ते स्वतःदेखील बोटीने प्रवास करणार आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी १ मार्च ते ८ मार्च दरम्यानचे वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:
१ मार्च: भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल.
२ मार्च: विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.
४ मार्च: भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल.
५ मार्च: विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.
७ मार्च: भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल.
८ मार्च: विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.