

मुंबई : मुंबईत पावसाळा सुरू होताच साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि एच१एन१च्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झालो असून १४ जुलैपर्यंत सर्वाधिक मलेरियाचे रूग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे रुग्ण ७३४ वरून ९३८, मलेरिया ३,११५ वरून ३,६८१, लेप्टोस्पायरोसिस १३६ वरून १५७, तर एच१एन१चे रुग्ण तब्बल ४२ वरून ११३ वर पोहोचले आहेत.
मात्र, कोविड-१९ आणि गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत मोठी घट ही दिलासादायक बाब आहे. कोविडचे रुग्ण १,०४९ वरून केवळ ७१ वर, तर गॅस्ट्रोचे रुग्ण ४,८३१ वरून ३,८६६ वर आले आहेत. चिकुनगुनियाही १७९ वरून ३१ पर्यंत घसरला आहे. या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने घराघरांत सर्वेक्षण, डास नियंत्रण मोहीम, बांधकाम साईट्सवरील तपासण्या आणि लेप्टो प्रतिबंधक औषधांचे वाटप सुरू केले आहे.
मात्र, नागरिकांनीही निष्काळजीपणा टाळून परिसरात पाणी साचू न देणे, उघड्यावरचे अन्न टाळणे, उकळलेले पाणी पिणे आणि ताप आल्यास तातडीने उपचार घेणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.