

Maharashtra Archaeology
मुंबई : राज्यातील कातळशिल्पे ही तब्बल वीस हजार वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जाते. जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांच्या सहकायनि या कातळशिल्पांचे वय निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी दिली.. तसेच, या कातळशिल्प ठिकाणांचा समावेश 'युनेस्को'च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत व्हावा, यासाठी रोडमॅप तयार करण्याच्या सूचनाही मंत्री शेलार यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांच्या अध्यक्षतेखाली कातळशिल्पांबाबत बैठक पार पडली. या बैठकीस विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, रत्नागिरी येथील निसर्ग यात्री संस्थेचे पदाधिकारी, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
या कातळशिल्पांना स्पॅनिश शिष्टमंडळाने भेट दिल्यानंतर 'युनेस्को' च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला, असे सांगून मंत्री शेलार म्हणाले की, आपल्याकडील कातळशिल्पांची चांगल्या प्रकारे प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर याचा संपूर्ण देशात प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे.
या कातळशिल्पांवर विभागाने आंतरराष्ट्रीय दर्जाची डॉक्युमेंटरी तयार केली पाहिजे. यासाठी या कातळशिल्पांचे फोटो, तसेच व्हिडीओ मोठ्या प्रमाणात संकलित करून ठेवावेत. या छायाचित्रे आणि व्हिडीओंना तंत्रज्ञानाची जोड देण्यावर मंत्री शेलार यांनी भर दिला.
कातळशिल्पांचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. कातळशिल्पांची व्यापक प्रसिद्धी व्हावी, यासाठी समाजमाध्यमांचा वापर करावा. या समाजमाध्यमांवर चांगल्या दर्जाची छायाचित्रे अपलोड करण्यात यावीत. डॉक्युमेंटरीसंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थांची पारदर्शक पद्धतीने निवड करण्याच्या सूचनाही मंत्री शेलार यांनी केल्या.
अपर मुख्य सचिव खारगे म्हणाले की, राज्यातील कातळशिल्पांचे सर्वेक्षण करून त्यांची जागा निश्चित करावी, यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम राबवावा. संरक्षित कातळशिल्पांचे संवर्धन व्हावे यासाठी योजना तयार कराव्यात.