

नागपूर : मुंबईसह इतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच आम्ही लढणार असल्याचा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि अन्य घटकपक्षांचाही समावेश असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
मात्र, राज्यभरात महायुती म्हणून लढणार, असे सांगताना मुंबईबद्दल वेगळे धोरण रवींद्र चव्हाण यांनी अधोरेखित केले. गंभीर आरोप असलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मुंबईतील महापालिका निवडणुकीचे नेतृत्व दिल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युती केली जाणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा एक प्रकारचा राजकीय शॉक समजला जातो.
दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर, तिचा साथीदार सलीम पटेल, 1993 च्या मुंबई स्फोटातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कम्पाउंडमधील मुनीरा प्लंबर यांच्या मालकीची तीन एकर जमीन कट रचून बळकावली, असा आरोप आहे. या व्यवहारातून मिळालेला निधी गुन्ह्यासाठी वापरला गेल्याचे ईडीचे म्हणणे आहे. मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत. मलिक यांच्या बाबतची अशी पार्श्वभूमी असल्यामुळेच चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत मुंबई महानगरपालिकेत युती करण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता आपला दुसरा नेता निवडणुकीत उतरविणार का, अशा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आपण स्वत: अशी आमची संयुक्त बैठक झाली. तसेच, भाजपच्या कोअर कमिटीचीही बैठक झाली. महानगरपालिका निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. परंतु, जिल्हा परिषद निवडणुकांमधील आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे या निवडणुका कदाचित लाबंणीवर जाण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्ये लढताना आगामी रणनीती आखण्याच्या दृष्टीने काही पद्धती विकसित करण्याची गरज व्यक्त केली होती. मुंबई व अन्य महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुती व्हायला हवी, अशा अपेक्षा या बैठकीमध्ये सर्वांनी व्यक्त केली. त्यानुसार सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षस्तरावर समित्या तयार करून युतीचा फॉर्म्युला ठरविण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाल्याची माहितीही रवींद्र चव्हाण यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महापालिका निवडणुकांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची कमिटी तयार करून पुढील नियोजन करण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाईल व आगामी निवडणुका या महायुती म्हणून सकारात्मकरीत्या लढण्याचा विचार व्यक्त करण्यात आला. बहुतेक ठिकाणी महायुतीमध्येच निवडणुका लढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार, गुरुवारी रात्री आमची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘देवगिरी’ या निवासस्थानी बैठक झाली. सर्व निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीमधील वरिष्ठ नेते वेळोवेळी घेतील त्याचप्रमाणे महानगरपालिका निवडणुकांमधील जागावाटप हे लोकहित आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ठरविण्यात येईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.