पुढारी ऑनलाईन डेस्क: यंदा वेळेआधी २ दिवस मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहचला. त्यानंतर दक्षिणेकडील आंध्रप्रदेश, तामिळनाडू राज्यातील भागात मान्सूनची वेगवान वाटचाल सुरूच होती. पुढे ४ जून रोजी मान्सून गोव्यात दाखल झाला. तर आज (दि.६ जून) मान्सून तळकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाला आहे. दरम्यान तो लवकरच राज्याची राजधानी मुंबईत (Mumbai Monsoon) दाखल होणार असून, यासाठी वातावरण प्रतिकुल असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, कर्नाटकचा उर्वरित भाग आणि किनारी आंध्र प्रदेश, महाराष्ट्राचा आणखी काही भाग (मुंबईसह), तेलंगणा, दक्षिण छत्तीसगडच्या काही भागात (चालू) पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल (Mumbai Monsoon) आहे, असेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात पुढे सरसावला आहे. कर्नाटकातील बहुतांश भाग, महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि किनारी आंध्र प्रदेश, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग आणि वायव्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग मान्सने व्यापला आहे, असे देखील हवामान विभागने एक्स पोस्टवरून स्पष्ट केले आहे.