

मुंबई : मेट्रो २ अ मार्गिका सुरू होऊन आता ४ वर्षे पूर्ण झाली आहेत; मात्र तरीही पावसाळ्यात बादल्या लावायची वेळ मेट्रो स्थानकांत येत आहे. गेल्या आठवड्याभरापासून मुंबईत पावसाचा धुमाकूळ सुरू असून बोरिवली पश्चिम आणि शिंपोली मेट्रो स्थानकात प्लॅटफॉर्मच्या खालील भागात छताला गळती लागल्याने बादल्या लावून ठेवण्यात आल्या आहेत.
मेट्रो २ अ मार्गिका १८.६ किमीची असून त्यावर १७ स्थानके आहेत. दहिसर पूर्व, आनंदनगर, कांदरपाडा, मंडपेश्वर-आयसी कॉलनी, एक्सर, बोरिवली पश्चिम, शिंपोली, कांदिवली पश्चिम, डहाणूकरवाडी या स्थानकांतून २ एप्रिल २०२२ साली मेट्रोसेवेचे संचालन सुरू झाले. त्यानंतर वळनई, मालाड पश्चिम, लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, पश्चिम, ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंधेरी पश्चिम ही स्थानके १९ जानेवारी २०२३ रोजी सुरू झाली.
६ हजार ४१० कोटी रुपये खर्चून मेट्रो मार्गिका
मेट्रो सुरू होऊन आता ४ वर्षे उलटली असली तरी स्थानकांत होणारी गळती रोखता अद्याप रोखता आलेली नाही. बोरिवली पश्चिम मेट्रो स्थानक आणि शिंपोली मेट्रो स्थानकांतील कॉनकोर्स लेव्हलच्या छतामधून पावसाचे पाणी गळत असल्याने येथे बादल्या लावून ठेवण्यात आल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे यातून मार्ग काढताना प्रवाशांची तारांबळ उडत आहे.या परिस्थितीमुळे गेल्या ४ वर्षांत ही गळती का रोखता आली नाही, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. तब्बल ६ हजार ४१० कोटी रुपये खर्चून ही मेट्रो मार्गिका उभारण्यात आली आहे.